ठाणे : यंदा राज्यभरात नवरात्रीमध्ये दांडिया-गरबाची मोठी धूम रंगली आहे. नवरात्रीत महिला व तरुणींच्या सुरक्षेची विशेष काळजी पोलीस दलाने घेतली आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेसाठी व अडचणीत सापडलेल्या महिलांच्या मदतीसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात दामिनी व पोलीस दीदी पथक तैनात करण्यात आले आहे. हे पथक चोवीस तास कार्यरत राहणार आहे. तर पोलीस दीदी या उपक्रमांतर्गत अडचणी सापडलेल्या महिलांना त्वरित मदत उपलब्ध करण्याबरोबरच समुपदेशन देखील करण्यात येणार आहे.
नवरात्रीत महिलांच्या छेडछाडीचे प्रकार वाढतात. हे प्रकार रोखण्यासाठी पोलीस दलाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी युवती व महिलांना काही भामट्यांकडून होणारा त्रास रोखण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस मुख्यालयात स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. त्याच बरोबर प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस मुख्यालयात महिलांच्या सुरक्षेसाठी व मदतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आल्या आहेत.
मुंबई-ठाण्यासह राज्यातील प्रमुख महानगरातील सर्व पोलीस ठाण्यात दामिनी आणि पोलीस दीदी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. अडचणीत सापडलेल्या महिलांच्या मदतीला त्वरित धावून जाणे, महिलांच्या तक्रारींची दखल घेऊन त्याचे निरासन करणे, महिलांच्या बाबतीत घडणारे गुन्हे हाताळणे व तपास करणे, पीडित महिलांना मानसिक आधार देऊन त्यांचे समुपदेशन करणे, पीडित महिलांना कायदेविषय सल्ला व मदत करणे, शाळा, कॉलेज परिसरात गस्त घालून विद्यार्थिनींच्या अडीअडचणी जाणून घेणे करणे आदी कार्य हे दोन्ही पथक करणार आहेत. एक पोलीस उपनिरीक्षक आणि चार महिला पोलीसांचा समावेश असलेल्या या दोन्ही पथकास स्वतंत्र दुचाकी वाहन देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या पथकांनी केलेल्या कार्याचा आढावा वरिष्ठ पोलीस अधिकारी घेणार आहेत. तसेच तक्रार आल्यास त्यावर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना या पथकास करण्यात आल्या आहेत. उत्सवाचा आनंद घ्या, मात्र अडचण असल्यास पोलिस प्रशासनास संपर्क करावा, तक्रार करण्यास घाबरू अगर टाळू नये. त्याचबरोबर चैन स्नॅचिंग होऊ नये याकरिता आवश्यकती नसेल तर मौल्यवान दागिने घालणे टाळावे, अनोळखी बाईकस्वार विनाकारण रेंगाळत असल्यास पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ठाण्यातील ठाणेनगर, नौपाडा, राबोडी, वागळे, श्रीनगर, कोपरी, वर्तकनगर, कापूरबावडी, चितळसर, कासारवडवली, कळवा, मुंब्रा, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर या पोलीस ठाण्यात दामिनी पथक आणि पोलीस दीदी पथक नियुक्त करण्यात आले आहे. दांडिया-गरबा आयोजकांना महिलांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. मद्यपान करुन येणार्या व्यक्तींना प्रवेश देऊ नये, आयोजकांचे स्वंयसेवक असावे, मंडप व गरबाच्या ठिकाणी सीसीटीव्ही असावेत अशाप्रकारच्या सूचना करण्यात आल्या आहेत.